Monday, September 5, 2016

बेरंग - भाग ४ , ५

मोठ्याच अंतराळानंतर घरी आलो आहोत. आईला आनंद होतो. ती काहीबाही बोलत राहते. एवढ्यात काय काय होवून गेलयं ते सांगते. दरवेळी एखाद दुसरा नातेवाईक ह्या ना त्या कारणाने गेलेला असल्याचे समजते. दरसाल माणसे पडत जातात. आईचं हे सांगणं बरेचदा माझे फारसे दिवस राहिलेले नाहीट हे सांगणंच असतं. आपण ओळखून विषय टाळतो.ती आपल्यासमोर वैद्यकीय तपासण्यांची अख्खी फाईल मांडते. जणू आपल्याला हे सगळं समजतं आहे अशा उत्साहात आपण ते सगळं बघतो. आईला धीर देतो. ह्यावेळी तिचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे म्हणून डॉक्टरानी तिला काही नवी औषधं सुरू केलीएत. बाटलीतलं ते लालभडक औषध बघून आपण उगाचच अरे वा म्हणतो. भारीच औषध दिसतयं. तुला नक्की आराम पडेल याने.यावर आई नेहमी प्रमाणे भला मोठा उसासा टाकते.
          तिची तगमग या तपासण्या आणि औषधांपेक्षा वेगळी आहे हे आपल्याला समजतं. खरंतर हे आपल्याला अनेक वर्षांपासून समजत आलेलं आहे. तिला नातवंडांचं तोंड बघायचं आहे. तिची अपेक्षा वयपरत्वे रास्तच आहे. एरवी तिचं आयुष्य संघर्ष आणि अभावांतच निघून गेलं होतं. वडील गेल्यापासून ते आपल्याला नौकरी मिळेपर्यंतचा काळ.  तब्बल बारा वर्षं. आमच्या बोल्ण्यात ह्या बारा वर्षांचा उल्लेख नेहमीच येतो. आई म्हणते, बाबा, रामचंद्रालादेखील बारा वर्षं वनवास सहन करावा लागला होता. आपण तर साधी माणसंच.

          मग काही बाही आठवणी निघतात. एखाद दुसरी दुखरी नस. सणासुदीच्या दिवसांमध्ये आजूबाजूच्या घरांमध्ये असणारी लगबग, रोषणाई आणि आपल्या घरातला अंधार आणि उदासी. परिस्थिती नसतानाही आई जमेल ते प्रयत्न करून आपल्यासाठी कपडेलत्ते करायची. आपण तिचं मन राखायचो पण प्रचंड वाईट वाटत राहायचं. आईच्या आनंदाचं काय? आपलं जे झालं ते झालं किमान आपल्या मुलाने चांगलं आयुष्य जगावं अशी तिचा प्रयत्न असायचा. आपण आणि आपले वडील हे तिचं सर्वस्व. वडील गेल्यानंतर आमच्या घराची आणि पर्यायाने आमचीही रया गेली.

          कुटुंबातलं एखादं मरण त्या संपुर्ण कुटुंबाला उध्वस्त करून जावं असं काहीसं होवून गेलं होतं. नातेवाईक, त्यांचे जाणते अजाणातेपणी होणारे उपकार,मदत. त्या उपकारांचं आपल्यावर झालेलं ओझं. हजार गोष्टी आहेत. घरी गेलं की ह्या सगळ्या गोष्टी डोक्यावर येवून कोसळतात. आपल्या डोळ्यांमध्ये सर्वदूर पसरून राहिलेली ही बेरंगी कुठेतरी आपल्या जुन्या दिवसांची देण असावी. खरंतर जगात रंगांची कमतरता नाही. पहाटेची केशरी भगवेपण. रात्रीची अथाह निळाई. रस्त्यावर दुतर्फा फुलणारी पिवळी-जर्द फुलं. आपल्या घरासमोरची जास्वंदी. वाट्टेल तितके रंग आहेत. आपल्याला ह्या सर्वांचा सपशेल विसर पडावा का ? की आपल्या रक्तातंच पाणी साचलं आहे ?


               कधी आला भाऊ ? एक प्रेमळ वयस्कर आवाज आपली तंद्री भंगवतो. द्रौपदामावशी, आईची मोठी बहीण आलेली असते. अरे मावशी ! तू कधी आलीस. आपण गडबडून विचारतो.
    मघाशीच आले बाबा. तुम्हा मायलेकाचं बोलणं सुरू होतं. म्हटलं कशाला खोडा घाला ! ह्यावर आई म्हणते, कायं गं आक्का, काही बोलते. तुझं येणं कसं खोडा होईल बाई? आई पुढे होत बोलते. बैस कशी इथं. मी चहा टाकते तुझ्यासाठी. आई अक्काला बसवून स्वयंपाकघरात लगबगीने जाते. आपल्या बहिणीला भेटून झालेला आनंद तिच्या लगबगीतून स्पष्ट जाणवतो.

  आई आणि अक्का दोघी सख्ख्या बहिणी. दिसतातही एकदम बहिणी बहिणीच. पण बहिणी कमी आणि मैत्रिणीच जास्त आहेत एकमेकींच्या. अक्काचा स्वभाव खूपच मायाळू. तिच्या तुलनेत आई थोडी कठोरच आहे. ऐन तारुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीने आईच्या स्वभावत कडवटपणाच येवून बसला होता. अक्का बिचारी फारच मऊ होती. एवढा मोठा संसार नेटाने सांभाळणारी. तीन पोरं आणि दोन पोरी असा मोठाच कुणबा होता तिचा. हाताला थोडीफार जमीन पण ती देखील कोरडवाहूच. घरी गरिबीचे कायम वास्तव्य. पण अक्काचं मन मोठं होतं. कधी कुणाच्या घरी रिकाम्या हातानं गेली नाही. काहीतरी घेवूनच यायची खायला. नाहीच काही मिळालं तर किमान डझनभर केळी तरी. तिच्या ह्या स्वभावाचं कायम कौतुकच वाटत आलं आहे आपल्याला. ही साधी माणसं, एवढी  मायाळू, एवढी माणुसकी असणारी. आणि दुसरीकडे आपण बघतो ते, ज्यात जगतो ते साधनसंपन्न जग.आपल्यासकट आपल्यासारख्या  कोत्या माणसांनी भरलेलं. दहा प्रकारचे विमे काढूनही आपल्याला नीट झोप लागत नाही. मागे ऑफिसाआतल्या गणपतीसाठी पब्लीकने आपल्याकडून दोन हजार वर्गणी काढून घेतली तर दोन दिवस करमलं नाही आपल्याला.
            बाकी काय, मुलं कशी आहेत ? आपण मावशीच्या एकेका मुलाचे नाव घेवून पृच्छा करतो. धाकला इथे, मधला तिथे. मोठा गावी. अजून कोणकोण कुठंकुठं. मावाशी भरभरून सांगते. आपण समजून घेतो आहोत असे दाखवण्याचा भरपूर प्रयत्न करतो. पण एवढं मोठं गणगोत, ते एका संवादात लक्षात राहणं कठीणंच. गेल्या काही दिवसांत अक्काची आर्थिक स्थिती बर्‍यापैकी सुधारलेली आहे असं समजतं. नाशिककडून आलेल्या पाण्यामुळं तिच्या शेतीचा भाव वधारला आहे. हे ऐकून आपल्याला खरंच आनंद होतो. कुठेतरी एखाद्या चांगल्या कुटुंबाचं भलं होतंय हे पाहून होणारा निरपेक्ष आनंद. मग विषयाला फाटे फुटत जातात आणि तिच्या घराचा विषय निघतो. मुलांनी तिचं घर विकायला काढलं आहे असं सांगून अक्का डोळे टिपू लागते. तिनं आणि तिच्या नवर्‍यानं मोठ्या कष्टाने बांधलेलं हे घर. त्या घरातंच तिनं आपलं बहुतेक आयुष्य काढलेलं. मुलांची दुखणीखुपणी, त्यांचं बालपण. या घरातच तिच्या नवर्‍याचा मृत्यू झाला. ह्या सगळ्या आठवणींचं अधिष्ठान असणारं हे घर मुलांनी बाप मरतो न मरतो तोच वर्षभरात विकायलाही काढलं होतं.

                  रडू नकोस, आक्का. ही तर जगराहाटीच आहे. हे जुनं घरं जाईल तर तुझ्या मुलांची नवी, सुखसुविधांनी युक्त घरं होतील हे का वाईट आहे ?  आपण उगाचंच काहीबाही सांगून तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. एव्हाना चहा घेऊन आलेली आईदेखील काही सांत्वनपर बोलू लागते. आपण आक्काला समजावण्यासाठी म्हणून बोललो खरं पण जुनं जाऊन नवं येण्याची ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा मोठीच जीवघेणी आहे. बरं झालं आपल्याला भावंडं नाहीत असा एक विचारही त्यावेळी मनात चमकून गेला.

       मावशीचं घर कुणा जवळचाच नातलग विकत घेणार आहे. मुलं घर विकून आलेला पैसा सचोटीनं वापरणार नाहीत अशी तिला काळजी वाटते. मोठ्याच्या डोक्यावर कर्ज आहे. मधला व्यसनी आहे. धाकल्याची संगत वाईट. शिवाय मुलींना वाटा दिला जाणार नाही, त्यामुळे भविष्यात जावई उलटतील आणि हिस्सा मागायला लावतील अशी शंकादेखील तिला भेडसावते आहे. पैशावरून आताच मुलांमध्ये आणि त्यांच्या बायकांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. काय गंमत आहे पाहा, सगळी रक्ताचीच नाती, पण एकदा पैसा मध्ये आला की निव्वळ व्यवहार सुरू होतो !

       आई आणि मावशीसोबत खूपच गप्पा होतात. बघता बघता संध्याकाळ होते. जेवणानंतर फिरायला म्हणून बाहेर पडतो. पलिकडच्या गल्लीत वेरुळकर सरांचे घर आहे. त्याना भेटून यावे असा विचार येतो. वेरुळकर आपल्याला इंग्रजी शिकवायचे. तळमळीचे शिक्षक - अत्यंत कमी पगारावर जीव तोडून काम करणार्‍या आदर्शवादी-ध्येयवादी पिढीतले झाड. ह्या लोकांनी आपली उमेदीची वर्षं अशीच घालवून टाकली. ना धड पैसा मिळवला ना केलेल्या कामचे श्रेय. पण तरीही ह्यांच्या चेहेर्‍यावर समाधान दिसून येतं. अशी गोष्ट जी आपल्याला कदाचित कधीच साधणारी नाही.
                 विचार करता करता सरांच्या घराजवळ जावून पोचतो. दार उघडेच असते. सर बल्बच्या उजेडात काहीतरी वाचत बसलेले असतात.
              येऊ का सर ? आपण विचारतो. अरे ! ये की असा ! विचारतोयस काय ? सर आनंदाने स्वागत करतात. आपल्याला बसायला खुर्ची देतात. आपण उगाचच थोडेसे वरमतो. राहू द्या सर. मी घेतो खुर्ची. तुम्ही बसा. सहजच आलो होतो भेटायला उभ्या उभ्या.  अरे वा ! असं कसं तू आमचा आवडता विद्यार्थी . शिवाय आता एवढा मोठा अधिकारी. तुला खुर्ची तर हवीच. सर मिश्कील्पणे बोलतात.
               काय सर. तुमची विनोदबुद्धी भारीच. अहो मी साधा सरकारी कर्मचारी आहे. शिवाय माझ्या डोक्यावर अधिकार्‍यांची अख्खी पंगतच आहे - मी कसला आलोय अधिकारी !  अशा काहीबाही गप्पा होतात. मग चहा. सर आता बर्‍यापैकी म्हातारे दिसू लागले आहेत. सध्या ते आणि काकू दोघेच असतात इथे. दोन्ही मुलांची ल्ग्नं होवून गेलीएत. एक मुलगा पुण्यात असतो तर दुसरा मुंबईत असे समजते.
                     मुलासोबत राहायला का गेला नाहीत हे विचारण्याचं धाडस होत नाही. एक तर म्हातारा तत्वांचा पक्का आहे हे आपल्याला चांगलंच ठाऊक असतं. दुसरं हे की आपली आई तरी कुठे राहते आपल्यासोबत ? खरंतर ह्या जुन्या पिढीला आपली मुळं तोडावीशी वाटत नाहीत. आपण मात्र पक्के उपरे झालेली आहोत. सरांशी बोलता बोलता मागे पडलेल्या गावांची मनातल्या मनात उजळणी सुरू असते.सर अनेक गोष्टींबद्दल बोलतात. बदलत चाललेली कुटूंबव्यवस्था, मुंबई पुण्याकडं स्थलांतरित होत असलेले लोंढे, महाराष्ट्राच्या उर्वरित भागांवर होत असलेला अन्याय. रस्तांवरचे खड्डे, धरणात राहिलेले पाणी. राजकारण, समाजकारण, जातकारण. एक ना हजार गोष्टी.
           सर तसे समाजवादी आहेत. देशात झालेला राजकीय बदल त्याना फारसा आवडलेला दिसत नाही. आपण ह्या बाबतीत थोडे उदासीन आहोत हे संकोचत मान्य करतो. मुळात आपण मोठे झालो तो कालखंड अतिशय कंटाळावाणा होता. साम्यवाद संपल्यात जमा झालेला अणि समाजवाद मोडकळीस आलेला होता. देशात धड सामाजिक बदलही घडून येत नव्हते नि तंत्रज्ञानातही फारशी प्रगती घडून येत नव्हती. फाळणी किंवा आणीबाणी सारख्या मोठ्या घटना आपल्या पिढीने पाहिल्या अथवा भोगल्याच नाहीत. त्यामुळे आपल्या पिढीच्या विशेष राजकीय - सामाजिक भूमिकाच नाहीत असे आपण सरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मग विचार येतो की कदाचित  ह्यामुळेच आपण एवढे निर्ढावलो आहोत. आपल्यापुढे आदर्श अजिबातच उरलेले नाहीत. नपेक्षा आदर्शांच्या पतनाच्या काळाअत आपण जगतो आहोत. सरांना आपण खूप मानतो पण त्यांच्यासारखे अभावांचे आयुष्य घालवण्याची आपली तयारी नाही.

                 पण मग आपल्याला जो एक सल टोचत असतो तो कसला आहे ? आई किंवा वेरुळकर मास्तरांच्या चेहेर्‍यावर जो एक संथ शांत भाव दिसतो तो आपण कधीच का अनुभऊ शकत नाही ?

                 असे ह्जार प्रश्न डोक्यात घेवून आपण वापस निघतो. प्रवास ह्या प्रश्न उपप्रश्नांच्या ससेमिर्‍यामुळे नकोसा होत असावा आपल्याला बहुतेक.


--

अनंत ढवळे

copyright @ Anant Dhavale
                     
     
                     
             

No comments:

Post a Comment